नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. राज्यातील बैलगाडा मालकांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या शर्यतींना आता सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यात तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणार आहेत.